प्रमोद पुरानिक

आजच्या महागाईच्या काळात सामान्य माणसांसाठी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पैशांची बचत; पण ती करायची कशी? तसेच पैसे कुठे गुंतवले पाहिजे? ज्यामुळे पैशांची वृद्धी
होण्यास मदत मिळेल? असे अनेक प्रश्न सामान्य माणसाल नेहमी पडतात, ज्याची उत्तरे त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीकडूनच मिळणे अत्यंत आवश्यक असते. या प्रश्नांसाठी नाशिकमधील ५० वर्षांपासून नावाजलेले नाव म्हणजे प्रमोद पुराणिक; ज्यांनी अध्यात्मिक, धार्मिक, सांस्कृतिक अशा विविधतेने नटलेल्या नाशिक ह्या पुण्यभूमीत १९७५ सालापासून गुंतवणूक संस्कृती विकसित करण्यास सुरुवात केली.
प्रमोद पुराणिक यांनी गुंतवणूक क्षेत्रात यायचे कसे ठरवले हे सांगताना ते म्हणतात की, ” लहानपणी मी एक वाक्य वाचले होते की शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये, परंतु हे शेअर बाजाराची पायरी चढू नये असे कुठे वाचले नव्हते”. एक सुखद योगायोग असा की ९ जुलै १९७५ ला पुराणिक यांनी शेअर बाजारात प्रवेश केला आणि त्याच दिवशी या बाजाराला १०० वर्ष पूर्ण झाले होते. शेअर बाजाराची सुरुवात ही ९ जुलै १८७५ रोजी झाली होती आणि ह्या शेअर बाजाराच्या १४७ वर्षाच्या कालखंडात ४७ वर्ष कार्यरत आहे हे ते अतिशय आनंदाने सांगतात.या क्षेत्रात काम करण्याचे अखंड व्रत नेहमी चालू ठेवण्याचा मानस देखील ते बोलून दाखवतात.
१९७५ च्या काळात नाशिक मधील नागरिकांना पोस्ट ऑफिस मधील गुंतवणूक या पलीकडे काही माहीत नव्हते, अशा परिस्थितीत शेअर संस्कृती विकसित करणे हे अत्यंत कठीण काम होते. शेअर खरेदी करणारे जे निवडक गुंतवणूकदार होते तेही यासाठी शेअर खरेदी करायचे की त्याच्या बदल्यात त्यांना काही मोबदला मिळेल, जसे की साखरेचे शेअर लोक का घ्यायचे तर त्या कंपनी कडून डिस्काउंट कूपन मिळते, कमी भावात साखर मिळते किंवा फुकट साखर मिळते; असे काही भागदार होते. यातून त्या काळात लोकांना शेअर बाजाराचे ज्ञान हे फारच कमी होते हे प्रकर्षाने जाणवते. तेव्हाची अशी बिकट परिस्थिती होती की महाराष्ट्रात शेअर बाजार होता पण शेअर बाजारात महाराष्ट्र नव्हता, हे बदलण्याचे कामही पुराणिक यांनी केले, आणि आताची परिस्थिती पाहता ते यशस्वीही झाले हे लक्षात येते.
शेअर बाजाराची सुरुवात ही प्राथमिक भांडवल बाजारपेठेने होते. शेअर खरेदी आणि विक्रीच्या सेवाही तेव्हा उपलब्ध नव्हत्या; त्यामुळे त्याकाळात जे भागदार बनले ते नवीन कंपन्यांच्या शेअर विक्रीचा अर्ज करून तयार झाले. गुंतवणूक संस्कृती ५० वर्षांपूर्वी वाढण्याचे श्रेय तत्कालीन पंतप्रधान कै. इंदिरा गांधी यांना जाते, कारण त्यांनी १९७३ साली FERA (Foreign Exchange Regulation Act) परदेशी चलन नियंत्रण कायदा अमलात आणला. ह्या कायद्यामुळे परदेशी कंपन्यांना भारतीय शेअर बाजारात त्यांच्या शेअरची नोंद करण्याची सक्ती केली, तसेच परकीय शेयर गुंतवणुकीचे प्रमाण हे १०० टक्क्यांवरुन ५१ टक्क्यांपर्यंत खाली आणले. बाजारातील या सक्तीमुळे अनेक कंपन्या शेअर बाजारात नोंदणीसाठी पुढे आल्या. कंट्रोलर ऑफ कॅपिटल इश्यू
( controller of capital issues) ही संस्था शेअर बाजारात एखाद्या कंपनीला शेअर विकायचे असेल तर त्याची विक्री करताना किती अधिमूल्य घ्यावे हे ठरवायची. अधिमूल्य ठरवण्याची त्या संस्थेची पद्धत अत्यंत चुकीची होती ज्यामुळे अनेक चांगल्या कंपन्यांचे शेअर हे अतिशय कमी भावात गुंतवणूकदारांना मिळायचे; जसे की १० रू दर्शनी किमतीचे शेअर १५ रू अधिमूल्य घेऊन कोलगेट ला २५ रुपयांना विकावा लागला त्यांना अधिकृतरित्या जास्त अधिमूल्य घेता आले नाही आणि त्यामुळे अनेक कंपन्यांवर प्रत्यक्षरीत्या अन्याय झाला. गुंतवणूकदारांना मात्र याचा नक्कीच फायदा झाला.
तंतज्ञान विकसित नसल्यामुळे वर्तमानपत्र हे त्याकाळात दुसऱ्या दिवशी मिळायचे, त्याला डाक एडिशन म्हणायचे. अशा दुसऱ्या दिवशी मिळणाऱ्या वर्तमानपत्रातून जी माहिती मिळायची ती शिळी बातमी, जुनी बातमी असायची.
मुंबई शेअर बाजारातल्या शेअर ब्रोकर कडे शेअर खरेदी विक्रीची ऑर्डर दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी काय भावाने शेअर विकत घेतले हे समजायचे. शेअर बाजार घराघरात पोहोचला याचे मुख्य कारण तंत्रज्ञान असल्याचे श्री. पुराणिक आवर्जून सांगतात.
ज्याकाळात नाशिकला शेअर बाजारात खरेदी विक्रीच्या सोई उपलब्ध नव्हत्या , त्याकाळात पुराणिक हे नाशिकला शेअर बाजार चालवत होते; ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. २५ वर्ष जनलक्ष्मी सहकारी बँकेचे डायरेक्टर , संचालक आणि उपाध्यक्ष ही त्यांनी भूषविले आहे, या संस्थेच्या माध्यमातून कंपन्यांचे अध्यक्ष, मुंबई शेअर बाजार कंपन्यांचे अध्यक्ष, स्टॉक ब्रोकर्स यांना बोलवण्यास त्यांनी सुरुवात केली तसेच गुंतवणूक परिषदेला नाशिक येथे प्रारंभ झाला.
१९८५ साली रिलायन्स च्या अपरिवर्तनीय कर्जरोख्यांसाठी (Non Convertible Debentures) मोठी सभा नाशिकमध्ये आयोजित करण्यात आली होती आणि या सभेला त्याकाळी ७५० गुंतवणूकदार आले होते आणि त्या गुंतवणूकदारांनी नाशिकमध्ये दीड कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.
शेअर बाजाराबद्दल सामान्य माणसांना माहिती व्हावी यासाठी संध्याकाळी ७.३० ते ८.३० जनलक्ष्मी बँकेच्या हॉल मध्ये ते १०० टक्के पारदर्शकतेने शेअर बाजार चालवत होते, यामागे विकणाऱ्याला आपला शेअर काय किमतीने विकला गेला हे समजणे आणि खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदाराला तिसऱ्या दिवशी हातात शेअर प्रमाणपत्र आणि बदली फॉर्म मिळणे हा हेतू होता.
छोट्या गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंडच्या माध्यमातून शेअर बाजाराचे फायदे घेतले पाहिजे या हेतूने १९८३ ते १९९२ या काळात युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया (UTI) या संस्थेच्या नाशिक जिल्ह्याचा मुख्य प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी पुराणिक यांना मिळाली. १० वर्षात UTI ची नाशिक मध्ये भरभराट होऊन ४ एप्रिल १९९२ ला UTI चे कार्यालय नाशिकमध्ये सुरू झाले. त्यानंतर श्री. पुराणिक यांनी म्युच्युअल फंडस् नाशिकमध्ये आणण्यास सुरुवात केली आणि आज बहुसंख्य सामाईक निधीचे ( Mutual Funds ) कार्यालये नाशिकमध्ये आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ( BST ) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे (NSE) टर्मिनल सब ब्रोकर्सकडे सुरू झाले त्यामुळे खरेदी विक्रीचे व्यवहार सुलभ झाले.

त्यांचे शेयर बाजारात येण्याचे मुख्य कारण म्हणजे सीएट टायर्स या कंपनीत भेटलेले यु.बी.मेहता हे अधिकारी.
मेहता हे अनेक कंपन्यांचे भागधारक असल्याने त्यांच्याकडे कंपन्यांचे वार्षिक अहवाल यायचे; ते अहवाल पुराणिक यांना त्या कंपनीत अकाउंटन्सी चे काम करताना वाचण्याची संधी मिळायची.
१९८० साली त्यांनी नाशिक गुंतवणूकदार संघटना ( Nashik Investers Association) ही संस्था स्थापन केली आणि या संस्थेतून गुंतवणूकदार निर्माण केले.

Leave a Comment