तीर्थक्षेत्र ते आधुनिक स्मार्ट सिटी आणि ट्राम ते येऊ घातलेली मेट्रो यासह नाशिकच्या अनेक बदलांचा मागील पाच पिढ्यांपासून साक्षीदार असलेले भगवंतराव मिठाई हे उपाहारगृह आजही येथील खवैय्यांच्या जीभेवर अधिराज्य गाजवत आहे.
—–
हा प्रसंग आहे सुमारे 75 वर्षांपूर्वीचा. म्हणजेच भारताला स्वातंत्र्य मिळालं, त्या 15 आॅगस्ट 1947 या सुवर्णक्षणाचा. स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेल्या अनेक नाशिककर स्वातंत्र्यसैनिक आणि कार्यकर्त्यांसह सामान्य जनतेचा उत्साह ओसंडून वाहत होता. मेनरोडवरील म्हणजेच तत्कालिन जुन्या मुंबई-आग्रा रोडवरील एका मिठाईच्या दुकानाने या उत्साहात आणखीनच भर टाकली. ते दुकान म्हणजे नाशिककर खवैय्यांच्या पाच पिढ्यांच्या जिव्हाळा आणि आस्थेचं स्थान असलेलं प्रसिद्ध भगवंतराव मिठाई. भारतीय स्वातंत्र्याचा आनंद अनेकांनी येथील मिठाई घेऊन आणि एकमेकांना वाटून साजरा केला. मेनरोड म्हणजे नाशिकच्या बाजारपेठेचा आत्माच. आजही मॉल आणि रेस्तरॉँच्या जाळ्यात या मेनरोडवरील भगवंतराव मिठाईने आपली वेगळी ओळख आणि वैशिष्ट्य टिकवून ठेवलं आहे. जुन्या पिढीतील कितीतरी अभिनेते, नट, राजकीय-सामाजिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी यांनी येथील चविष्ट आणि लज्जतदार पदार्थांची चव चाखलेली आहे. एकेकाळी उपाहारगृहासोबतच येथे लॉजिंगचीही सोय होती.
ब्रिटिशांच्या काळात नाशिकजवळ रेल्वे आली. त्यामुळे तीर्थक्षेत्र आणि धार्मिक कर्मकांडांसाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिक शहरातील वर्दळही वाढू लागली. हा तोच काळ होता जेव्हा लोकमान्य टिळकांच्या स्वदेशी आणि स्वातंत्र्याच्या मंत्राचे वारे नाशिकमध्ये वाहू लागले होते. स्वातंत्र्य चळवळीतून जन्मलेल्या नव्या विचाराने येथे आधुनिकतेचे वारे वाहू लागलेले होते. त्यातच विविध धरणे, होळकर पूलासारखा पंचवटी आणि नाशिक शहराला जोडणारा पूल, चलनी नोटांचा कारखाना आणि देवळालीतील सैनिकी तळ यामुळं नाशिक शहराची वाटचाल सुधारकी विचार आणि आधुनिकतेकडे सुरू झालेली होती. याच पार्श्वभूमीवर सनातनी विचारांच्या नाशिकमध्ये उपाहारगृहांचीही सुरूवात होऊ लागली होती. खरं तर उपाहारगृह सुरू करणं आणि त्याची लोकांना गोडी लावणं हे त्या काळाच्या मानाने खूपच धाडसाचं आणि पुढारलेलं पाऊल होतं. अष्टपूत्रे कुटुंबियांनी ते केलं आणि आपल्या लाघवी स्वभावासह, स्वच्छ आणि लज्जतदार पदार्थांनी नाशिककरांच्या जिभेवर आणि मनातही स्थान निर्माण केलं. आज त्याला 110 वर्षे झाली आहेत.
भगवंतराव मिठाईची स्थापना झाली ते वर्ष होतं सन १९१२ आणि दिवस होता श्रावणातील नागपंचमीचा. म्हणजे नाशिकसारख्या तीर्थक्षेत्रातील चातुर्मासाचा. मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील वाळकीचे असलेले भगवंत गोविंद अष्टपुत्रे यांनी या दुकानाची स्थापना केली. सध्या त्यांचे पणतू सुहास दत्तात्रय अष्टपुत्रे हा व्यवसाय सांभाळतात. त्यांची पाचवी पिढीही व्यवसायासाठी प्रशिक्षित होत आहे. इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या जमान्यात मागच्या दहाएक वर्षांपासून नाशिकच्या मिसळचा चांगलाच बोलबाला होत आहे. अगदी दूरवरून लोक या मिसळच्या वेडापायी नाशिकला भेट देतात. भगवंतराव मिठाईची खासियत म्हणजे येथील मिसळ. जेव्हा मिसळचा बोलबालाही नव्हता, तेव्हा नाशिकमध्ये सर्वप्रथम मिसळ भगवंतरावांकडे मिसळ मिळायला सुरूवात झाली होती. सुरुवातीच्या काळात मिसळ फक्त १२ आण्याला म्हणजेच पैशांच्या भाषेत केवळ 75 पैशांना विकली जात होती. इथली जिलेबी सुद्धा फार प्रसिद्ध होती आणि आजही आहे. केवळ मिसळच नव्हे, तर या उपाहारगृहात दिवाळीचा खमंग व ताजा फराळ, साबुदाण्याची खिचडी, मसाला दूध आणि पेढे, बर्फी, श्रीखंड यासारखे दुग्धजन्य पदार्थ असे अनेकविध प्रकार विकले जात आहेत. आजही या पदार्थांची चव आणि दर्जा तसाच ठेवण्यात या उपाहारगृहाला यश मिळालं आहे. मागील १०० वर्षांहून अधिक जुना असलेला हा व्यवसाय बांधिलकी, कठोर परिश्रम आणि सर्जनशील दृष्टी यामुळे आजही कार्यक्षमतेने चालू आहे. अशी उदाहरणे फार कमी आहेत जिथे पुढची प्रत्येक पिढी व्यवसायात मूल्य वाढवते आणि भगवंतराव या पैकीच एक आहेत.
व्यवसाय सुरू झाल्यानंतर काही वर्षातच भगवंतराव मिठाईच्या अनेक शाखा सुरू झाल्या. भगवंतराव चहा, समाधान हॉटेल, कॉलेजरोडवरील भगवंतराव मिठाई इत्यादींचा त्यात समावेश होता. परंतु कालांतराने माणसांच्या कमतरतेमुळे आणि मुले बाहेरगावी नोकरीनिमित्त असल्यामुळे इतर शाखा बंद कराव्या लागल्या. सध्या त्यांची एकच मेनरोड येथील मूळ शाखा सुरू आहे.
आजही भगवंतराव मिठाईच्या फराळाला दिवाळीमध्ये अतिशय मागणी असते. या काळात येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी बघायला मिळते. भगवंतराव मिसळ प्रसिद्ध असल्याने एरवीही सकाळच्या वेळेत मिसळसाठी प्रचंड गर्दी असते, याशिवाय जिलेबी, दहीवडा, कढी भेळ असे पदार्थही येथे अप्रतिम मिळतात. त्याचा आस्वाद घेण्यासाठी नव्या आणि जुन्या पिढीतील नाशिककर आवर्जून येथे येतातच. फार पूर्वी एकदा दुकानाची भिंत पडली होती, एकदा आग लागण्याचा प्रसंग घडला होता असे वाईट अनुभव देखील भगवंतराव मिठाईच्या वाट्याला आलेले आहेत. मात्र तरीही हे उपाहारगृह त्यातून सावरून खंबीरपणे नाशिकरांच्या सेवेत उभे आहे. भगवंतराव मिठाईचा मागच्या ११० वर्षात नाशिकच्या सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्राशी संबंध आला आहे. नाशिक कॉँग्रेस अधिवेशन झाले तेव्हा भगवंतरावच्या अष्टपुत्रे यांनीच तेथे जेवणाची व्यवस्था केली होती. त्यावेळेस अनेक आमदार, खासदारांनी पण उपाहारगृहाला भेट दिली होती. मायको, सीमेन्स अशा कंपनीला देखील ते मिठाई पुरवत आहेत. नाशिकमध्ये खाद्यपदार्थ तसेच उपाहारगृहाचे प्रेम शतकाहून अधिक जुने आहे. त्याचेही भगवंतराव मिठाई साक्षीदार आहे. कारण ते या उद्योगाचे प्रणेतेच आहेत. यातच व्यवसायाच्या दृष्टीने नाशिक शहर अत्यंत अनुकूल आहे. सध्याचे आॅनलाइन युग असले तरीही त्यांच्या व्यवसायावर त्याचा काहीही परिणाम झालेला दिसत नाही. कारण दुकानात जे गरम आणि ताजे पदार्थ मिळतात त्यासाठी ग्राहक खास दुकानात येतात.
मंत्रभूमी अशी ओळख असलेले नाशिक मध्यंतरी यंत्रभूमी आणि आता स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणारे महानगर म्हणून उदयाला येत आहे. त्या अनुषंगाने विविध बदल देखील आता होताना दिसत आहेत. लवकरच नाशिकमध्ये मेट्रोही येऊ घातलेली आहे. इंग्रजांच्या काळात याच भगवंतराव मिठाईजवळ असलेल्या सरकारवाड्यासमोरून घोड्यांची ट्राम नाशिकरोड रेल्वे स्थानकापर्यंत जात असे. कालांतराने त्यांची जागा मोटारी, सर्व्हिस मोटारी, शहर वाहतुक बस आणि आता मेट्रो घेऊ पाहत आहे. पूर्वी एक-दोन मजली इमारती असलेला मेनरोडही आता बहुमजली आधुनिक इमारतींनी बदलतो आहे. या सर्व बदलाचे साक्षीदार असलेले भगवंतराव आजही त्याच तळमळीने नाशिककरांच्या नव्या पिढ्यांना सेवा पुरवत आहे.
—-